मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या ‘माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणुकीपूर्वी लाभ मिळालेल्या तब्बल ८० ते ८१ लाख महिला छाननीत अपात्र ठरल्या आहेत. महिलांची मते मिळवण्यासाठी हा पैसा वाटप करण्यात आला. आता निवडणुका झाल्यानंतर महिलांना अपात्र करण्यात आले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केले आहे.
आम्ही केवायसीची विंडो ओपन करायला तयार आहोत
वारंवार सांगूनही लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही आणि केवायसी करूनही ज्या निकषात बसत नाहीत, अशा महिलांचे मानधन थांबवले आहे. जवळपास २५ लाख महिलांची केवायसी चुकली होती, त्यांना आपण सुधारून घेतले. मी आज महिलांना पुन्हा सांगतो की, कुणालाही वाटत असेल की, आपण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहोत. परंतु आमची केवायसी करायची राहून गेली तर आजही आम्ही केवायसीची विंडो ओपन करायला तयार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
फसवणूक करुन घेतलेले सर्व पैसे वसूल करणार
ज्यांना अर्ज करता येतं त्यांना कागदपत्र केवायसी करता न येणे हे मान्य नाही. कुठला एक निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. योजना पात्रतेचे निकष पूर्ण करताना दिसत नाही. 1 कोटी 70 लाख महिला निकष पूर्ण करतात त्यांना पैसे मिळत राहतील. केवायसी न केलेल्या त्यांना पैसे देणार नाही. मात्र बहीणींकडून पैसे पुन्हा पण घेणार नाही. लाडकी बहीणींचे पैसे घेणारे 14 हजार पुरुष निघालेत. या पुरुषांकडून फसवणूक करुन घेतलेले सर्व पैसे वसूल करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच लाडकी बहीण केवायसी करणार असेल तर आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकारी पैसा खर्च करतो तेव्हा सीएजी ऑडिट होतं. योजना सुरु झाल्यावर आपण केवायसी सुरु केलं. सरकारी कर्मचारी आहेत, त्यासंदर्भात माहिती घेतली. परिवहन विभाग आहे, चारचाकी डेटाबेसची माहिती घेतली आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं, की 5 लाख असे आहेत ज्यात चारचाकी आहे. 14 हजार पुरुष निघालेत. अडीच लाख रुपयांपैक्षा उत्पन्न अधिक आहे, असे पण काहीजण निघाले. केवायसी करून घ्या सांगितलं, मात्र ती झाली नाही. त्यामुळे अपात्रांची संख्या 80 लाखांवर गेली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.




