मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अचानकपणे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला. विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात एकचर्चा होत आहे. त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भविष्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवे, एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे. या मुद्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य केले आहे.
आमचीच शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसा पुढे चालवत आहे
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “आमचीच शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असून, आम्हाला जनतेचा खरा कौल मिळाला आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विलीनीकरणाचे वृत्त फेटाळून लावले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जुळून येण्याच्या शक्यतेवर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांनी सोमवारी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या वक्तव्यांमुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे सरकार आम्ही एकदा नाही तर दोनदा यशस्वीपणे स्थापन केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता शिवसेना, ‘धनुष्यबाण’ चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद देईल, असे त्यांनी म्हटले.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
शिंदे यांचा गट संपवण्याचं काम भाजपा करत आहे. बाळासाहेब यांच्या विचारांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची जी शिवसेना आहे, तिला कोणीही संपवू शकत नाही. दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यावं, असं मला बऱ्याच वेळा वाटतं. परंतु ते मला एकट्याला वाटून काहीही फायदा नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.




