ओझे l विलास ढाकणे
दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशा प्रमाणात विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटे चार वाजेपासून पुन्हा सुरुवात केली मात्र सकाळी ८ वाजे पासून पूर्ण तालुक्यात मुसळधार ते काही भागांत अति मुसळधार पावसाने कहर केला आहे. यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.
दिंडोरी तालुक्यात पावसाच्या संततधारेमुळे तालुक्यातील धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून तालुक्यातील करंजवण धरण जवळपास ८०% भरले असून घरणातून कादवा नदीत ६८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने ओझे करंजवण कादवा नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुक बंद झाली आहे. विशेष म्हणजे करंजवण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून टप्या टप्याने विसर्ग वाढविण्यात येणार असण्याची माहिती करंजवण शाखा अभियंता आकाश ठाकरे यांनी दिली.
तालुक्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग
त्याचप्रमाणे मांजरपाडा (देवसाने) प्रकल्प परिसरात मध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत आहे. तसेच पुणेगाव धरणक्षेत्राही जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरणातून ८oo क्युसेक्स पाण्याचा विसर्ग उनंदा नदीत सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील पावसात पुणेगाव धरण पूर्णक्षमतेने भरले होते मात्र सतत पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी ७०% पाणीसाठा ठेवण्यात आला होता, मात्र आता धरण ७५% पुन्हा भरले आहे त्यामुळे पुन्हा पुणेगाव धरणातून अदांज पाहून पाणी सोडणार असल्याची माहिती पुणेगाव धरण शाखा अभियंता दंडगव्हाण यांनी दिली.
त्यासोबतच, ओझरखेड धरण पहिलेच 100% भरले असून सांडव्यातून विसर्ग चालू असून वाघाड धरणही पूर्ण क्षमतेने यापूर्वीच भरले असल्यामुळे सांडव्यातून विसर्ग चालू आहे. कोलवण, कादवा , उनंदा सारख्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. हे सर्व पाणी पालखेड धरणात जमा होते तसेच दिंडोरी शहरातून जाणा-या देवनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून हे पाणीही पालखेड धरणातच जात असल्यामुळे पालखेड धरणात पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, दुपारी पालखेड धरणातून कादवा नदीत १११४४ क्युसेक्स इतका विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला आहे. तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे हा विसर्ग रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यानी दिली.
दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी पहाटे पासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे कादवा, कोलवण, उनंदा, देवनदी, बाणगंगा नद्यानां मोठ्या प्रमाणात पूर येत आल्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कुणीही पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये. शेतकरी वर्गाने आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी.असे आव्हान दिंडोरी पेठ चे प्रांत आप्पासाहेब शिंदे,दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे व दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रेंगडे यांनी केले आहे.




