नाशिक | Nashik
नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर रस्त्यांची कामे सुरु असून त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे ज्यामुळे रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जायबंदी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले.
शहर वाऱ्यावर सोडले आहे का?
मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल तसेच कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) कामांतील नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. छगन भुजबळ म्हणाले की, “सगळीकडे खड्ड्यांची बातमी आहे. कोतकर यांचा मृत्यू नुकताच झाला. कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. रस्ता करताना नियम असा आहे, एका बाजूला रस्ता झाला तर दुसऱ्या बाजूचा रस्ता खड्डेविरहित पाहिजे. तातडीने रस्ते बुजविले पाहिजेत. कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत, मनपा आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे. नगरसेवक स्वतः वैतागले आहे, महापौर, आमदार यांचेही अधिकारी ऐकत नाहीत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष द्यावे. नगरसेवक, महापौर यांचे ऐकत नाहीत. शहर वाऱ्यावर सोडले आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
थोडी तरी माणुसकी दाखविली पाहिजे
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “हा सर्व विषय मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचा मनपा आणि शासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनाही 10 लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. एवढे खड्डे नाशिकमध्ये कधी नव्हते. नाशिकचे नाव खराब होत आहे. आपल्या नाशिकमध्ये हे काय सुरू आहे, वाईट वाटते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. महापालिका आयुक्तांना जबाबदारी घ्यावीच लागेल. थोडी तरी माणुसकी दाखविली पाहिजे. कुटुंबाप्रती संवेदना दाखवली पाहिजे. असंतोषाची वाट कोणीही पाहू नये. यात सर्व आले, असे म्हणत त्यांनी यंत्रणेला सावध करणारा सूचक इशारा दिला.
अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाहीत. कुंभमेळा असो किंवा काही पण शेवटी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी हे महापालिकेवरच आहे. रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची तर ही महापालिकेचीच जबाबदारी आहे. माझं काम नाही, त्याचं काम आहे असे म्हणून चालणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.




