नाशिक | प्रतिनिधी
काही कपडे, एक नवा मोबाईल फोन आणि सुखी संसाराचे खोटे स्वप्न… एका १६ वर्षांच्या अनाथ आदिवासी मुलीला जाळ्यात ओढण्यासाठी दलालांना एवढेच प्रलोभन पुरेसे ठरले. पण याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे, या मुलीच्या मानवी तस्करीचा तब्बल २ लाख रुपयांचा व्यवहार चक्क यूपीआय सारख्या डिजिटल माध्यमातून पूर्ण करण्यात आला.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ऑपरेशन शोधमुळे हरसूल परिसरातील या आंतरजिल्हा मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, १० जणांना अटक करण्यात आली आहे. मानवी तस्करी किंवा बालविवाहाचे व्यवहार गुपचूप आणि रोखीने केले जातात, असे आतापर्यंतच्या विविध दाखल गुन्ह्यांत व तपासात समोर आले आहे. मात्र, या गुन्ह्यात संशयितांनी थेट ऑनलाईन पेमेंटचा वापर केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पीडित मुलीला तिच्या वडिलांच्या रखवालीतून पळवून नेल्यानंतर, संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील तुषार पपिंड (२९) याच्याशी तिचा बेकायदेशीर बालविवाह लावून देण्यात आला. या व्यवहारासाठी दोन्ही बाजूंच्या दलालांनी २ लाख रुपये उकळले. यातील मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर झाली. मुलगी गायब झाल्यानंतर गावातून कोणताही तरुण बेपत्ता नसल्याचे पाहून पोलिसांनी तांत्रिक तपास आणि बँक खात्यांचे डिजिटल फूटप्रिंट्स तपासले, तेव्हा या रॅकेटचा सुगावा लागला.
पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ६० वर्षीय वृद्ध महिलेसह एकूण १० नातेवाईक आणि दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित तुषार पचपिंड, संदीप पचपिंड, सुरेश फसाळे, कमल फसाळे, सिता बेंडकोळी, ठकुबाई माळेकर, धर्मा फसाळे, सोन्याबापु पाटोळे, विशाल परचंडे आणि महादेव नाईकवाडे यांचा समावेश आहे.
ऑपरेशन शोध ठरले यशस्वी
अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक जीवन बोरसे, सुनील आहेर आणि त्यांच्या पथकाने कौशल्याने तपास करत मुलीची सुटका केली. डिजिटल पेमेंटचा वापर करून आधुनिक आणि संघटित पद्धतीने चालणाऱ्या या मानवी तस्करीने आता आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.




