नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केले आहेत. २८ फेब्रुवारीपासून या तिन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्ध छेडल्याने जगभरातील नागरीक भयभीत झाले आहेत. इराणने प्रत्युत्तरादाखल आखाती देशांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा धोक्यात आल्याचं सांगून या तिन्ही देशांनी संयमाने निर्णय घ्यावा आणि हा संघर्ष लवकरात लवकर थांबवावा, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात संघर्ष वाढणे दुर्दैवी
28 फेब्रुवारी रोजी इराण आणि इस्त्रायल-अमेरिका संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढवू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असं आवाहन केलं होतं. मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती अधिकच बिघडल्याचे मंत्रालयाने नमूद केलं. इराण आणि आखाती भागातील संघर्षावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. या संघर्षात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल भारताने तीव्र शोक व्यक्त केला. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेत राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जवळचा शेजारी म्हणून या घडामोडींमुळे मोठी चिंता
“गेल्या काही दिवसांत हा संघर्ष फक्त वाढलाच नाही तर इतर देशांतही पसरला आहे. विनाश आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे जनजीवन आणि आर्थिक गुंतवणूक ठप्प झाली आहेत. या क्षेत्राची सुरक्षा आणि स्थैर्य यामध्ये आमचे महत्त्वपूर्ण हितसंबंध गुंतलेले असल्याने आणि एक जवळचा शेजारी म्हणून या घडामोडींमुळे मोठी चिंता निर्माण होत आहे”, असंही भारताने म्हटलं आहे.
आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिकांचे वास्तव्यास
आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे काम करतात. त्यांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या प्रदेशातील कोणत्याही नकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, याचीही चिंता सरकारने व्यक्त केली.
अमेरिका इस्रायलसोबत संघर्ष सुरु असतानाच इराणवर नवं संकट; भूकंपाने हादरलं शहर
संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना जारी करत आहेत. अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले.
देश म्हणून भारत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचाही ठाम विरोध करतो
आमचा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी देखील याच भूभागातून जाते. कोणत्याही मोठ्या व्यत्ययाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात. ज्या देशाचे नागरिक जागतिक कार्यबलात आघाडीवर आहेत, असा देश म्हणून भारत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचाही ठाम विरोध करतो. गेल्या काही दिवसांत झालेल्या अशा हल्ल्यांमुळे काही भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे किंवा ते बेपत्ता आहेत”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
“त्यामुळे, हा संघर्ष लवकरात लवकर संपावा असे आम्ही ठामपणे सांगत आहोत.




