मुंबई | Mumbai
‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अखेर विद्यार्थी आंदोलनाचा वाढता रेटा पाहून शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील वीर सावरकर मार्गावर भव्य विजयी सभेचे आयोजन केले होते. या सभेत दोन्ही ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि भावनांना प्रथम प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन हे पूर्णपणे अराजकीय होते,परंतु विरोधी पक्षांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी यामध्ये हस्तक्षेप करून त्याला राजकीय वळण दिले असा आरोप त्यांनी केला.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत पत्र; म्हणाले, “विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश…”
पंतप्रधानांच्या निवासाजवळ घातपात घडवून आणण्याचा हेतू
राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की,”स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान निवासस्थानाच्या (PM House) सुरक्षेसाठी एसपीजी कायदा करण्यात आला. या उच्च सुरक्षा क्षेत्रात कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसते. विरोधी पक्षनेते असूनही राहुल गांधी यांनी जंतर-मंतरऐवजी पंतप्रधानांच्या निवासाभोवती हजारो-लाखो लोकांना जमण्याचे आवाहन केले. यामागील दुष्ट हेतू बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंकेप्रमाणे भारतातही अराजकता पसरवणे आणि पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी घातपात घडवून आणणे हाच होता, असा गंभीर आरोप त्यांनी राहुल गांधींवर केला. देशाने यापूर्वीच दोन पंतप्रधान गमावले आहेत. सुरक्षा नियमांची पूर्ण कल्पना असतानाही राहुल गांधी यांनी केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून, याची गंभीर दखल घेतली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
महाराष्ट्राने नाकारलेले दिल्लीत भडकावत होते
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना नाकारले, ते दिल्लीत जाऊन विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावरून ‘पेटवा-पेटवी’ची भाषा करत होते. “आग लागली आहे, विझू देऊ नका” असा सल्ला ते देत होते. देशात अराजकता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, विद्यार्थ्यांनी सामंजस्याने आंदोलन मागे घेतल्यानंतर या नेत्यांची मोठी निराशा झाली आहे” असे त्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
महायुती आणि केंद्र सरकार नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. ते म्हणाले की,”विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या असून आता त्यांनी कोणत्याही राजकीय भुलथापांना बळी न पडता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि उज्ज्वल भवितव्य घडवावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.



