मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीनेही आता या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येतेय. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवणार असून यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
या 17 जागांपैकी काँग्रेस सात ते आठ जागा लढणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना पाच ते सहा जागा लढणार आहे. त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ते चार जागावर लढणार असल्याची माहिती आहे. कोण कुठल्या जागांवर लढणार याविषयीचा निर्णय दोन तीन दिवसांत घेतला जाणार आहे. 29 तारखेला मविआ नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल. महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठविण्याचा मविआचा प्रयत्न आहे.
आज बुधवारी(27 मे) मविआ नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितलं की, “सर्व १७ जागा आम्ही मविआ म्हणून लढणार आहोत. जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. दोन दिवसांत अंतिम बैठक होईल.
गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, ‘पैसा फेक तमाशा देख’चा दुसरा अंक सुरु झाला असून ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे. अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही, उलट सुसंवाद आहे. दुसरीकडे ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफुस सुरु आहे, असेही सपकाळ म्हणाले.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे तो ती लढवेल अशी माहिती आहे. त्यानुसार चंद्रपूर, सांगली-सातारा या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. तर परभणी हिंगोलीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यानुसार जागावाटप होणार असल्याची माहिती आहे.
महायुतीची दिल्ली वारी
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीतील जागावाटपावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या जागावाटपाचा तिढा ही आता दिल्ली दरबारी गेला आहे. विधान परिषदेच्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल असे काही मोजके मंत्रीही दिल्लीत दाखल होणार आहेत. महायुतीचे तिन्ही नेते अमित शाहांना भेटून जागावाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं कळतंय.




