नाशिक | Nashik
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. परभणी, नांदेड हिंगोली, वाशिमसह यवतमाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे. अचानक घरे हादरू लागली, भांडी पडू लागल्याने एकच खळबळ उडाली. घाबरलेले लोक घरातून बाहेर पळत रस्त्यावर जमा झाले. ११ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ ते ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने भूकंपाची तीव्रता कमी असल्याने जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी आठ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात अनेकवेळेस भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र यावेळेसचा भूकंपाचा धक्का हा मोठ्या प्रमाणात असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने घरांच्या भितींना तडे गेले असून घरावरील पत्रे हलल्याचीही घटना घडली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी घरामध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडले आहेत. या भूकंपाने मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना धक्के जाणवले आहे. तर वाशिम जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काही गावांमध्ये ८.४५ दरम्यान हादरे जाणवले.
नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के
नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. शहरातील सिडको, वजीराबाद, आनंद नगर, तरोडा सांगावी भागात हे धक्के प्रकर्षाने जाणवले आहेत. मिलेल्या माहितीनुसार, 4.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती आहे. वसमत येथील पांगरा शिंदे येथे 10 किमी खोलीवर भुकंपाचे केंद्र असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याची माहिती आहे.





