नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रातील मोदी सरकारने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी एक दणका दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, पाकिस्तानातील २३ व्यक्तींना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. हे सर्वजण पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
गृह मंत्रालयाने याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली असून, या सर्वांची नावे UAPA च्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सरकारच्या माहितीनुसार, या व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणणे, तरुणांची भरती करणे, शस्त्रांची तस्करी करणे आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवणे अशा कामांमध्ये सक्रिय होते. सध्या यातील बहुतांश जण पाकिस्तान किंवा पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले आहे.
Nashik Rain News: दिंडोरीत पावसाची जोरदार हजेरी; खरीप पिकाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग
या दहशतवाद्यांमध्ये मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसादिक, मुफ्ती मोहम्मद असगर कान आणि हाफिज अब्दुल शकूर, अब्दुल रऊफ, हाफिज खालिद, मौलाना सैफुल्लाह खालिद, मोहम्मद याकूब, मौलाना युसूफ तैयबी, ओवैस फारूज, राणा इफ्तिखार, वसीम नूर जाट, मोहम्मद शहीद फैसल यांच्यासह एकूण २३ जणांचा समावेश आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, यादीतील काही संशयितांचा २०१६ मधील नगरोटा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ला आणि २०२२ मधील जम्मूच्या सुंजवान भागातील सुरक्षा दलांवरील हल्ल्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या यादीतील अब्दुल रऊफ आणि हाफिज खालिद वलीद यांची नावेही आहेत. हे दोघे लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद यांचे निकटचे सहकारी असल्याचा आरोप गृह मंत्रालयाने केला आहे.




