नाशिक | Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (CM Devendra Fadnavis and Uddhav Thackeray) यांची बुधवारी वर्षा निवासस्थानी भेट झाल्याचा दावा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचा दावा करण्यात आला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या चर्चेला दुजोरा मिळालेला नाही. त्यानंतर आता या भेटीच्या वृत्तावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘गोदा ते नर्मदा (Goda to Narmada) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभ प्रसंगी जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या जलदिंडीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री (CM) आले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन; मंत्री भुजबळांनी केले स्वागत
यावेळी ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचे (Meet) असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती खुली देखील केली जाऊ शकते. ते कुठलेच विषय आमच्यात नाहीत की, जे लपवायची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देत आहेत. त्या खोट्या बातम्या देणाऱ्या हँडल्सना नोटीस बजावली जाईल”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
प्रबुद्ध भारतच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने त्यांच्या हँडल्सवर “मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.”, असे म्हटले आहे. ही पोस्ट २३ एप्रिल रोजी शेअर करण्यात आली होती. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर गुप्त भेट?
संजय राऊत काय म्हणाले?
या भेटीवर आज (शनिवारी) सकाळी माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का याचे उत्तर ते दोन्ही नेतेच देऊ शकतात. तसेच याबाबतची माहिती माझ्याकडे असली तरी मी तुम्हाला का सांगू, बऱ्याच गोष्टी राजकारणात घडणार आहेत, मी का सांगू. आत्ताच कशाला त्याच्यावर पाणी ओतायचे,असं संजय राऊतांनी म्हटले.





