नाशिक | Nashik
शहरात आज (गुरुवारी) सायंकाळी पावणे सहा वाजेच्य सुमारास पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासून कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार सरी कोसळल्या.
शहरातील शालिमार, मेनरोड, सीबीएस, पंचवटी, सातपूर, सिडको, अंबड आणि नाशिकरोड परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. याचा वाहतुकीवर देखील थोड्याफार प्रमाणात परिणाम झाला. या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जीवाला धोका; SIT चे न्यायालयाला पत्र, आजच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं?
दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) देखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कांदा, गहू या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’
भारतीय हवामान विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ (इगतपुरी) यांच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यावर पुढील तीन दिवस पावसाचे सावट राहणार आहे. शुक्रवारी (दि.३) जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, ताशी ४०-५० किमी वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच रविवार(दि.५) पर्यंत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. या काळात कमाल तापमान ३५-३७ अंश तर किमान तापमान १९-२० अंशांच्या दरम्यान राहील.
हे देखील वाचा : Nashik Crime : पाटणकर टोळीचा पोलिसांनी केला ‘करेक्ट’ कार्यक्रम; सात जणांवर केली ‘ही’ कारवाई
शेतकऱ्यांची चिंता वाढली
आज (गुरुवारी) झालेल्या पावसामुळे आणि पुढील काही दिवसांच्या अंदाजामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने कांदा आणि गहू या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस फळबागांसाठीही घातक ठरू शकतो.
हे देखील वाचा : Nashik Crime : गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने पावणेपाच लाखांचा गंडा





