नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी (Nashik Vidhan Parishad Election) सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी (दि. २) उमेदवारी अर्जाची छाननी झाली. अर्ज छाननी प्रक्रियेत सर्व ९ उमेदवारांचे १४ अर्ज वैध ठरविण्यात आले असून, आता सर्वांच्या नजरा अर्ज मागे घेण्याच्या मुदतीकडे लागल्या आहेत.गुरुवारी (दि.४) अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. सोमवारी (दि.१)अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये हे सर्व अर्ज पात्र ठरले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : युतीच्या घटकपक्षांमध्ये नाराजी; दराडेंचा अर्ज भरण्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ तर कांदे गैरहजर
दरम्यान ही निवडणूक सोपी जावी यासाठी शिंदे शिवसेनेकडून अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला असल्याने शिंदे सेनेकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जात असून, नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यात वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना कितपत यश येते ? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
उमेदवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार खालीलप्रमाणे
नरेंद्र भिकाजी दराडे (शिवसेना), मोहम्मद खालिद अब्दुल रशीद (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र), यांच्यासह कुणाल नरेंद्र दराडे, परवेझ मोहम्मद युसूफ कोकणी, गोकुळ बबन गिते, गणेश बबन गिते, प्रसाद बळीराम हिरे, निवृत्ती (गोरख) देवराम बोडके, विष्णू रुंजा म्हैसधुणे यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरले. भाजपचे गणेश गिते व प्रसाद हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे विष्णू म्हैसधुणे यांनी पक्ष आणि अपक्ष अशा दोन्ही स्वरूपांत अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्या अर्जासोबत आवश्यक ‘एबी फॉर्म’ जोडलेला नसल्याने त्यांचे पक्षाचे अर्ज बाद झाले असून, आता ते केवळ अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी नऊ जणांचे तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल; छाननीत कुणाचे अर्ज बाद होणार?
आता लक्ष माघारीकडे
छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी निवडणुकीचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार (दि. ४) संपल्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात नेमके किती उमेदवार राहतात आणि लढत कोणामध्ये होणार, हे स्पष्ट होईल. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता ‘माघारी’च्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




