
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरातून तेथील नागरीक सावरत असतानाच आता पुन्हा नव्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळ-चीन सीमाभागातील भूस्खलनामुळे तयार झालेल्या जलसाठ्यातील पाणी वाढत असल्याने तेथील तलाव कधीही फुटू शकतो आणि आधीच्या पुरापेक्षा पाच पट अधिक धोका यामुळे होऊ शकतो. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
त्रिशूली परिसरात पुन्हा सतर्कतेचा इशारा
नेपाळच्या त्रिशूली परिसरात वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी अचानक वाढण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती पाहता बचावकार्यालाही काही काळ अडथळा निर्माण झाला.
नुवाकोट जिल्ह्यावर हे महापूराचे संकट आहे. प्रशासनाकडून नागिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धंडे बाजार आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्याची पातळी वाढत चालली आहे त्यामुळे पुढच्या २० ते २५ मिनिटांत पुराचे पाणी या भागात येऊ शकते.
धुंडे बाजारमध्ये पोलिस आणि प्रशासकीय पथके नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करत आहेत. नागरिकांना त्यांची घरे आणि दुकाने रिकामी करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा वारंवार प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. याठिकाणी धोका वाढत असून कोणताही निष्काळजीपणा महागात पडू शकतो, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी रहिवाशांना दिला.
नेपाळ पोलिसांनी सुरक्षा कर्मचारी, मदत व बचाव कार्य करणारे पथक आणि सामान्य जनतेला सतर्क राहण्याचे व सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लोकांनी आपल्या आसपासच्या इतरांनाही या धोक्याबद्दल माहिती द्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने खाली येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संभाव्य पूर आधीच्या पुरापेक्षा कित्येक पटीने अधिक भयानक असू शकतो. त्यामुळे प्रभावित भागातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुवाकोट हा भाग भोटेकोशी-त्रिशूली नदीच्या पुरामुळे आधीच उद्ध्वस्त झाला असून तिथले अनेक रस्ते आणि पुलांचे आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नव्या पुराच्या धोक्यामुळे बचाव आणि शोधमोहीमेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाने धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे.नेपाळमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जलसाठ्यातील पाणी आणखी वाढल्यास पुन्हा अचानक पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, मृतांचा आकडा ४५० वर पोहचला आहे. तर १५०० पेक्षा जास्त जण बेपत्ता झाले आहेत. भारतामधील २९० पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत.




