नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांचे पडसाद केवळ राज्यातच नव्हे तर दिल्लीपर्यंत उमटले आहेत. खरातचे अनेक बड्या राजकारण्यांसोबतचे फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकाच विषयाची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली असून, खरातसारख्या प्रवृत्तींमुळे आम्हाला मान खाली घालावी लागतेय, असे म्हटले आहे.
स्वतःला आध्यात्मिक शक्ती असलेला बाबा म्हणवून घेणाऱ्या खरातने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये केल्याचे काही व्हिडिओंमधून समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते खरातच्या पाया पडताना किंवा त्याच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. यामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अशोक खरातचे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजे. खरात प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा खूप मोठा धक्का आहे. देशात खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. बाकीच्या राज्यातील खासदार भेटतात, तेव्हा बोलतात, हे तुमच्या महाराष्ट्रात काय चालू आहे. हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.”
अजित पवारांचा फोन सापडतो मग ब्लॅक बॉक्स का नाही?
“अजित पवारांच्या अपघातासंदर्भात न्याय मिळवण्यासाठी रोहित पवारांना देशात आणि राज्यात फिरावं लागतं, हे वाईट आहे. ज्या महाराष्ट्राने अजित पवारांना न्याय द्यायला हवा होता, त्यांना तो दिला नाही. कर्नाटक सरकारने अजित पवारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांची चौकशी केली पाहिजे. अजित पवारांच्या अपघाताला अडीच महिने झाले, पण सीआयडी काय करते? असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्लॅक बॉक्सचं काय झालं? ब्लॅक बॉक्स जळाला, अशी अफवा पसरवण्यात आली. अजित पवारांचा फोन सापडते. मग ब्लॅक बॉक्स का नाही?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.




