नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी हैदराबादमधील जनसभेला संबोधित करताना देशवासियांना सोने खरेदी न करणे, परदेश दौरे कमी करणे आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. तसेच कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ वाढवण्यासही सांगितले होते. यावरून विरोधकांकडून सरकारवर राजकीय हल्ले केले जात आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्स या सोशल मीडिया (Social Media) हँडलवरून पोस्ट करत मोठे विधान केले आहे.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “देशातील सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी”; CM फडणवीसांचा हल्लाबोल
शरद पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी (Sharad Pawar) दिली आहे.
हे देखील वाचा : Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देश चालवणे आता ‘कॉम्प्रमाईज्ड’…”
राज ठाकरेंनीही पंतप्रधानांना लिहिले खरमरीत पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित थेट विचारणा केली आहे. एकीकडे पंतप्रधान जनतेला पेट्रोल-डिझेल आणि परदेश दौरे टाळण्यास सांगत आहेत, मात्र दुसरीकडे स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणुका काढत आहेत. आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी असे करणार नाही, असे तुम्ही देशाला सांगणार का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेने का सोसायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला.





