
जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून सरकारला दिलेली मुदत संपत आली असतानाच, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे. “जर आमच्या मागण्यांची मंजुरी झाली नाही, तर १०० टक्के उपोषण होणारच,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी सकारात्मकता दाखवत, “मागण्या पूर्ण झाल्या तर उपोषणाची गरजच पडणार नाही,” असेही नमूद केले.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज अंतरवालीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. ३० मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र मनोज जरांगेंनी उपोषणाला बसू नये, असे आवाहन भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आले. मनोज जरांगेंच्या या आवाहनानंतर आज प्रसाद लाड अंतरवालीत भेटीसाठी पोहोचले.
मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांनी माध्यमांसमोर संवाद साधला. यावेळी प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत महत्त्वाचं वक्तव्य करताना मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
मनोज जरांगेंच्या १० मागण्या काय?
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.




