नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आम आदमी पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले असून त्यानंतर लगेचच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले आहे. राघव चढ्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठकयांच्यासह आणखी काही खासदारांनी AAP सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीनंतर AAP ने त्यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. पंजाबच्या जनतेनं या खासदारांना इतकं प्रेम दिलं पण त्यांनी जनतेचा विश्वासघात केला असून जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असं सांगताना प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरुन देशभरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
संजय सिंह म्हणाले, “पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे काम रोखण्याचा प्रकार सुरू झाला आहे. पंजाबचे सरकार मोफत वीज, मुलांना शिक्षण आणि पाणी देण्याचे काम करते. तेथील नागरिकांना १० लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी तोडण्याचे काम केले आहे. पंजाबच्या जनतेला धोका देण्याचे काम करण्यात आले आहे.”
गद्दारांना पंजाबी जनता कधी माफ करणार नाही
संजय सिंह म्हणाले, पंजाबमध्ये आपचं सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्यांनी ऑपरेशन लोटस सुरु केले आहे. याच ऑपरेशनसाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या आणि भाजपत प्रवेश करत असलेल्या आपच्या गद्दार खासदारांना पंजाबची जनता कायम लक्षात ठेवेन. राघव चड्ढांना पक्षाने आमदार आणि खासदार नबवले. काय-काय दिलं नाही, सांगा… सातही लोकांना जमिनीवरून उचलून संसदेत पाठवण्याचे काम पक्षानं केलं. पण, सातही जणांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे,” अशी टीका संजय सिंह यांनी केली आहे.
संजय सिंग यांनी असा दावा केला की, या सात बंडखोर खासदारांमध्ये हरभजन सिंग आणि स्वाती मालीवाल यांचाही समावेश आहे. त्यांनी भाजपवर “संघटित भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा पक्ष” असल्याचा आरोप करत या नेत्यांनी त्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल टीका केली.
ईडी सीबीआयच्या माध्यमातून खासदारांना पक्षात घेतलं जाते
“पंजाबमध्ये मान सरकार शिक्षण, पाणी यासाठी काम करत आहे. परंतु, सरकारसोबत ऑपरेशन लोटसचा खेळ सुरू आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून खासदारांना पक्षात घेतलं जात आहे. अलीकडेच खासदार अशोक मित्तल यांच्यावर ईडीची धाड पडली होती. भीती दाखवून ऑपरेशन लोटस सुरू आहे. पंजाबची जनता माफ करणार नाही,” असा संताप सिंह यांनी व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्यानंतरची सर्वात जास्त भ्रष्ट पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. या पक्षात कोणी सामिल होऊन ईमानदारीची गोष्ट करतोय याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? ज्या पक्षानं संपूर्ण देशात एक संघटित भ्रष्टाचार केला आहे. त्या पक्षात सामिल होऊन तुम्ही स्वतःला भ्रष्टाचारविरोधी कसे म्हणून शकाल? तुमच्यावर कोण विश्वास ठेवेन? अशा शब्दांत संजय सिंह यांनी राघव चढ्ढा आणि त्यांच्यासोबत भाजपत गेलेल्या खासदारांवर निशाणा साधला आहे. या फसवणुकीचं उत्तर पंजाबचे लोकच देतील असंही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.





