ठाणे | Thane
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या २००८ मधील परप्रांतीय मारहाण प्रकरणातील पहिल्या गुन्ह्याचा आज (२१ मे २०२६) अंतिम निकाल लागला. आंदोलनादरम्यान कथित चिथावणी दिल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर होता. कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत व्ही. कुलकर्णी यांनी या खटल्याचा फैसला सुनावला आहे.
न्यायालयाने काय निकाल दिला?
२००८ मधील परप्रांतीयांना मारहाण प्रकरणातील घटनेचा निकाल आज १८ वर्षांनी लागला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने आज एक मोठा दिलासा दिला आहे. २००८ मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून राज ठाकरेंना निर्दोष मुक्त केले आहे. आंदोलनादरम्यान कथित चिथावणी दिल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर होता. मात्र, सरकारी पक्षाला त्यांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट करणारे आणि गुन्हा सिद्ध होईल असे कोणतेही ठोस पुरावे न्यायालयात सादर करता आले नाहीत.
आरोपी घटनास्थळी प्रत्यक्षात हजर होते, याचा पुरावा सरकारी पक्षाला सादर करता आला नसल्याचे कोर्टाने म्हटले असल्याचे राज ठाकरे यांच्या वकिलांनी म्हटले. मारहाण झालेले उमेदवार हे परप्रांतीय होते, त्यांना मारहाण करणारे कार्यकर्ते मनसेचे होते, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नसल्याचे कोर्टाने म्हटले.
काय आहे प्रकरण?
2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात राज ठाकरे हे ‘आरोपी क्रमांक १०’ आहेत. राज ठाकरे यांनी ‘मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या’ असा आरोप करत भडकाऊ भाषण केल्याचा ठपका फिर्यादी पक्षाने ठेवला आहे. त्यांच्या याच चिथावणीखोर भाषणामुळे प्रवृत्त होऊन मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केले, असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल होता, ज्यातील दोन आरोपींचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला आहे.




