मुंबई | Mumbai
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खासदारांची बैठक बोलावली होती. ‘ऑपेरशन टायगर’ राबवले जाणार असल्याच्या चर्चा सुरु असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची ही बैठक घेतली. काल झालेल्या या बैठकीत राज्यसभेची हक्काची जागा हातून गेल्यावरून खडाजंगी झाल्याचे समजते. या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरुन प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मध्येच हस्तक्षेप करत थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. त्यात उद्धव सेनेच्या जवळपास सर्वच खासदारांनी हजेरी लावली. या बैठकीची नेमके काय चर्चा झाली याची सर्व माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार यांच्यासाठी शिवसेनेची हक्काची खासदारकीची जागा सुटल्याने खासदार प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्याचे समजते आहे.
खासदारांच्या बैठकीची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला भाजप, राष्ट्रवादीचे लोक सांगतात. तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यसभेच्या जागेबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी काँग्रेसच्या म्हणण्यानूसार विरोधी पक्षाच्यापदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असे सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली
I want to Protest प्रियंका चतुर्वेदींचा आक्रमक पवित्रा
या घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे खासदारांना देत होते. उद्धव ठाकरे बोलत असतानाच प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत I want to protest. Why Sanjay Raut was giving a statement about Sharad Pawar? असा प्रश्न केला. चतुर्वेदी यांच्या या अनपेक्षित प्रश्नाने बैठकीतील वातावरण तापले. यावर ते (संजय राऊत) बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. ते बोलले म्हणून काय झालं शेवटी निर्णय मीच घेईल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली, अशी सूत्रांनी माहिती दिली.
बैठक संपल्यानंतर एका खासदाऱ्याने प्रियंका चतुर्वेदी यांना ६ वर्षे संधी देऊन देखील काय उपयोग झाला असा सवाल देखील मराठवाड्यातील एका खासदाराने उद्धव ठाकरे यांना केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा आहेत, पण आदित्य ठाकरेंनी फिरले पाहिजे, अशी तक्रार खासदारांनी केली होती. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी कुठलाही संवाद साधला नाही. ते जरा नाराज होते, असे देखील खासदारांचे म्हणणे आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





