नाशिक । प्रतिनिधी
देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, डिझेलचा तुटवडा, बेरोजगारी आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेने (ठाकरे गट) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा कडाडून निषेध करण्यात आला.
महिला शिवसैनिकांनी थेट रस्त्यावरच ठाण मांडून चूल पेटवत स्वयंपाक केला. घरगुती गॅस आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर शिवसैनिकांनी बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या महागाईविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध केला. या आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आंदोलनानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण झालेला डिझेलचा तुटवडा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी यांसारख्या गंभीर समस्या मांडण्यात आल्या आहेत.
आंदोलन शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार वसंत गिते आणि महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
यावेळी जिल्हा संघटक केशव पोरजे, जिल्हा समन्वयक जगन आगळे, उपजिल्हाप्रमुख सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, सचिन बांडे, निलेश साळुंखे, मयूर परदेशी, मंदार बर्वे, कुलदीप आढाव, विशाल कदम, राहुल दराडे, विलास घोलप, विनोद दळवी, विजय काळदाते, गोरख वाघ, सुधाकर जाधव, राहुल ताजनपुरे, प्रवीण चव्हाण दिलीप मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा दूर करून नियमित व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घ्यावेत. बेरोजगार तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना राबवाव्यात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव व आर्थिक सहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे.




