नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
‘ऑपरेशन सिंदूर’मध्येभारतीय जवानांनी भीमपराक्रम गाजवत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. भारतीय जवानांच्या आक्रमणासमोर पाकिस्तानने अक्षरशः गुडघे टेकले आणि युद्धविरामाची अक्षरश: भीक मागितली. या ऑपरेशनदरम्यान आपल्या प्राणाची पर्वा न करता लढलेल्या ६ जवानांना हौतात्म्य आले. या शहीदांची नावे पहिल्यांदाच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून त्यांना वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रायफलमॅन सुनील कुमार यांना मरणोत्तर ‘वीर चक्र’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना ‘वायु पदक’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीरांमध्ये, सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमॅन सुनील कुमार, लांस नायक दिनेश कुमार, अग्निवीर मूळ मुरली नायक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि सार्जेंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. संरक्षण सूत्रांनुसार, यातील बहुतेक जवान जम्मू आणि काश्मीरमधील मोहिमेदरम्यान शहीद झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर जवानांची नावे प्रथमच जाहीर केली आहेत. या सर्व शहीदांसाठी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात एक जागा निश्चित करण्यात आली आहे, जिथे त्यांची नावे विशेष ग्रॅनाइट विटांवर कायमस्वरूपी कोरली जातील. या सहा शहीदांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलाचे एक सार्जंट यांचा समावेश आहे.
यांपैकी, सुभेदार मेजर पवन कुमार हे १० इन्फंट्री ब्रिगेड मुख्यालयात, रायफलमॅन सुनील कुमार हे ४ जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीत, लांस नायक दिनेश कुमार हे ५ फील्ड रेजिमेंटमध्ये, अग्निवीर मूल मुरली नायक हे ८५१ लाइट रेजिमेंटमध्ये, हवालदार सुनील कुमार सिंह हे २३७ फील्ड वर्कशॉपमध्ये आणि सार्जेंट सुरेंद्र कुमार हे भारतीय हवाई दलाच्या ३९ विंगमध्ये तैनात होते. या सर्व हुतात्म्यांची नावे नॅशनल वॉर मेमोरियलच्या वेबसाईटवरही जोडण्यात आली आहेत. ‘त्याग चक्र’मधील एका विशेष विटेवरही त्यांची नावे लिहिली जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रायफलमॅन सुनील कुमार यांच्या कुटुंबीयांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान केले.




