पंचवटी | प्रतिनिधी
पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढत गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या घटनांत कोयत्याने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आडगाव, पंचवटी आणि म्हसरूळ या भागांत घडलेल्या या घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरात जुन्या वादातून रिक्षाचालक हरिभाऊ खंडाळे (४१) यांच्यावर प्रेम व आदित्य खलसे या संशयितांनी हल्ला केला. रिक्षा वळवत असताना दोघांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत फुलेनगर परिसरात तडीपार असलेल्या संशयिताने मजूर तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. भरत कुंदे (२०) याला “मी तडीपार आहे” अशी धमकी देत अमन सैय्यद याने धारदार शस्त्राने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शुभम दिक्षीत यालाही मारहाण करण्यात आली. संबंधित आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
तिसऱ्या घटनेत म्हसरूळ परिसरात नवनाथ बिंदे (३०) यांच्यावर जुन्या वादातून हल्ला करण्यात आला. ईश्वर पवार, दगड्या गुंबाडे आणि यश पवार यांनी संगनमत करून बिंदे यांना अडवले. यावेळी कोयत्याने वार करत तसेच दगडाने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले. तीन्ही घटनांमुळे पंचवटी परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर धंद्यांचा विळखा
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित गस्त नसल्याने नागरिक त्रस्त असून, रात्री टवाळखोरांची दहशत, अवैध मद्यविक्री आणि हॉटेलमधील पार्सल पॉइंटमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. यंत्रणेशी संबंधच्या चर्चांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा मोठी घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.





