मुंबई | Mumbai
राज्यात मे महिन्यात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अनेक जिल्ह्यांमधील पारा ४५ डिग्री पार झाला आहे. तसेच विदर्भात तर अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांचे तापमान ४७ डिग्रीवर पोहोचले आहे. अशातच आजपासून म्हणजेच २५ मे पासून नवतपा चे दिवस सुरु झाले आहे. यामुळे उष्णतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात उष्ण 9 दिवस. हे नऊ दिवस सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांनी टोक गाठलेले असते.
काय आहे नवतपा
नवतपा आजपासून म्हणजेच २५ मे ते २ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर व पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. २८ ते ३० मे दरम्यान या भागांमध्ये तीव्र वादळाचाही इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये विदर्भात २५ ते ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहणार आहेत.
दरवर्षी साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्यानंतर सलग नऊ दिवस प्रचंड उकाडा जाणवतो. या कालावधीला ‘नवतपा’ असं म्हटलं जातं. भारतीय परंपरा आणि हवामानशास्त्रानुसार, या काळात सूर्याची किरणं पृथ्वीवर अधिक तीव्रतेने पडतात. त्यामुळे तापमान झपाट्याने वाढतं आणि अनेक भागांमध्ये उष्णतेची लाटही जाणवते. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या सुरुवातीला हा काळ नागरिकांना सोसावा लागतो. या दिवसात दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा, उष्ण वारे आणि अंगाची लाही लाही करणारे ऊन यामुळे नागरिक हैराण होतात. तब्बल ९ दिवस ही परिस्थिती कायम राहते. त्यामुळे याला नवतपा म्हटले जाते.
या काळात काय परीणाम होऊ शकतात
या नवतापाच्या काळात वाढत्या उन्हामुळे हिट स्ट्रोक, अशक्तपणा, चक्कर येणे आणि डिहायड्रेशनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने थकवा डोकेदुखी आणि बेचैनी जाणवू शकते. या काळात लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि बाहेर काम करणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास जाणवू शकतो.
नवतपापासून स्वतःची काळजी कशी घ्याल?
नवतापाच्या काळा भरपूर पाणी आणि ORS प्यावे. दुपारच्या वेळेत उन्हात जाणे टाळावे. हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा. डोक्यावर टोपी किंवा ओढणीचा वापर करावा. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखी पेयं प्यावे. भारतीय हवामानात नवतपाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण या काळानंतर अनेक भागांत मान्सूनपूर्व बदल जाणवू लागतात.




