मुंबई | Mumbai
राज्यात सध्या काही ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची अजून प्रतिक्षा होताना दिसत आहे. अशातच आता एकीकडे काही जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे मात्र राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मान्सून पोहोचला असला तरी तो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी १५ जून उजाडणार आहे. परंतु, हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व ठिकाणांवरील एकूण २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
मोसमी पावसाची वाटचाल हळू हळू सुरु
मोसमी पावसाची वाटचाल सुरु असून हळूहळू मोसमी पाऊस देशाच्या काही भागात दाखल होत आहे. दरम्यान, रविवारी मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात तसेच त्रिपुरा, मेघालय येथील काही भाग, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागांसह मिझोराम, मणिपूर आणि नागालँड येथील संपूर्ण भाग व्यापून वाटचाल केली, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुढील ३ ते ४ दिवसात उर्वरित अरबी समुद्रासह महाराष्ट्राच्या काही भागात मोसमी पाऊस पुढे सरकरण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Nashik Crime News : अल्पवयीन मुलीची प्रसूती; डॉक्टरसह ९ जणांना अटक
या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अकोलासह अन्य २५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ६ जून ते ९ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यात काही जागी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि कोल्हापूर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, नाशिक घाट विभाग आदी भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




