
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
१० जुलै रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक FAQ जारी करून स्पष्ट केले की, ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’ (EBP) बाबतचे समज हे केवळ गैरसमज आहेत. वाहन कंपन्यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले असले तरी, आता मंत्रालयाने लोकांच्या शंका दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या प्रश्नोत्तरानुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि तथ्यांवर आधारित स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्र सरकारने २३ जून २०२६ रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आधीच एक निवेदन जारी केले होते.
इथेनॉल मिश्रित पेट्रोल शुद्ध पेट्रोलपेक्षा महाग का असते याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्र सरकारने सांगितले की, आज भारतीय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकार वाजवी दरात इथेनॉल खरेदी करत आहे. मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलचे उदाहरण घ्या. आम्ही खरेदीची किंमत हळूहळू वाढवली आहे आणि आज ती अंदाजे ७१.८६ रुपये प्रति लिटर आहे.
यामध्ये जीएसटी, वाहतूक, साठवणूक आणि डेपो हाताळणी खर्चाचा समावेश नाही. म्हणून जर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे ७० अमेरिकन डॉलर असेल तर E20 चे उत्पादन शुद्ध पेट्रोलपेक्षा प्रत्यक्षात अधिक महाग पडते. जर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२०-१३० अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली तर परिस्थिती स्वाभाविकपणे उलटते आणि इथेनॉल आणखी स्वस्त होते.
सरकारने आपल्या निवेदनात असे देखील सांगितले की, तुमचा प्रश्न हा नसावा की ‘E20 स्वस्त का नाही?’ खरा प्रश्न हा आहे की ‘भारताने ग्राहकांना जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारांच्या पूर्ण परिणामांपासून कसे सुरक्षित ठेवले आहे?’ याचे उत्तर सोपे आहे. आज भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे २० टक्के देशांतर्गत उत्पादित इथेनॉल असते. ते इथेनॉल सुमारे ७१ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जाते. ही अशी किंमत आहे जी दररोज सकाळी ब्रेंट क्रूडच्या किमतीनुसार भू-राजकीय संघर्षांनुसार किंवा वाहतुकीतील व्यत्ययांमुळे बदलत नाही.
इथेनॉलचा तुमच्या इंधन टाकीवर परिणाम होणार नाही असं देखील सरकारने सांगितले आहे. तुमच्या इंधन टाकीचा पाचवा भाग आंतरराष्ट्रीय तेल किमतींमधील चढउतारांपासून संरक्षित असतो. जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा भारतातील किरकोळ इंधन दरांमध्ये सर्वात कमी वाढ होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाचा उद्देश एखाद्या विशिष्ट दिवशी पेट्रोल स्वस्त करणे हा नाही. तर आयात केलेल्या कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व कमी करणे हा आहे. यामुळे परिणामी प्रमुख अर्थव्यवस्था आणि शेजारी देशांच्या तुलनेत भारतात गेल्या ४ वर्षांत इंधनाच्या दरात सर्वात कमी वाढ नोंदवली गेली आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की रबरी पाईप्सची झीज किंवा इंजिन बंद पडणे (सीझ होणे) यांसारख्या चिंता केवळ अफवा आणि एका विशिष्ट गटाद्वारे पसरवलेला अपप्रचार आहे; त्यात अजिबात तथ्य नाही. E20 चा आराखडा अंतिम करण्यापूर्वी वाहन उत्पादक, ARAI, SIAM आणि तेल कंपन्यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समित्यांची स्थापना करण्यात आली होती. हे इंधन बाजारात आणण्यापूर्वी वाहनांची ४०,००० किमीपेक्षा जास्त अंतर चालवून चाचणी घेण्यात आली होती. जुन्या वाहनांच्या मॅन्युअलमधील ‘E10’ चा उल्लेख केवळ हे दर्शवतो की वाहन प्रमाणित झाले त्या वेळी तेच प्रचलित मानक होते; याचा अर्थ असा नाही की नंतर इंधनाचा दर्जा सुधारल्यास (अपग्रेड केल्यास) ती कार असुरक्षित बनते.




