मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. यानंतर राज्य सरकारकडून (State Government) राज्यात २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. मात्र, त्याचवेळी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक विभागाकडून ७५ शाळांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे राज्य सरकारचे वाभाडे निघाले असता आता याप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयात फायलींवर सह्यांचा सपाटा; ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा?
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वाक्षरी केलेल्या फाईलींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. याशिवाय दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या निधनानंतर गुपचूपपणे प्रमाणपत्रांची खिरापत वाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अजित दादांच्या निधनानंतर काही तासांतच फाईलींवर स्वाक्षरी करून संबंधितांना दिलासा देण्याचे काम करणारे वरिष्ठ अधिकारी नक्की कोण? कुणाच्या सूचनांनी मंत्रालयातील सूत्रे हलली? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
अजित पवार हयात असताना त्यांनी ज्या फाईल्स पेडिंग ठेवल्या होत्या, त्या फाईल्सवर त्यांच्या निधनानंतर, त्याच दिवशी घाईघाईत स्वाक्षरी करण्यात आल्या. ऑगस्ट २०२५ पासून या शाळांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. पण अजित पवार यांचे अपघाती निधन होताच अल्पसंख्यांक विभागातील अधिकाऱ्यांनी स्थगिती डालवून अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे (Minority Department) वाटप केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. यातील पहिले प्रमाणपत्र २८ जानेवारी रोजी म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी देण्यात आले. त्यामुळे राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असाही प्रश्न विचारला जात आहे.
हे देखील वाचा : Rohit Pawar : “सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत…”; रोहित पवार का संतापले?
रोहित पवारांचा संताप
सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही? असे प्रश्न रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या फायलींवर अधिकार्यांकडून सह्या करण्यात आल्या त्याबाबत विचारले आहेत .




