
नाशिक | Nashik
काँग्रेसच्या (Congress) संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ७८ जिल्हा अध्यक्षांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांना कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग, शेतकरी समस्यांसह विविध विषयांची माहिती देण्यात आली. त्यानंतर याबाबत आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हे देखील वाचा : Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेणार राहुल गांधींची भेट; मंत्री उईकेंचा राजीनामा मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा
दरम्यान आज (बुधवारी) सकाळी राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याच्या (Nashik Tour) पार्श्वभूमीवर शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’ला (महिला आरक्षण विधेयक) विरोध केल्याचा आरोप करत भाजपने हे आंदोलन केले. भाजपच्या महिला आरक्षण आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले की, ” काँग्रेसने महिला आरक्षणाला (Women Reservation) विरोध केला हे कोणत्या मूर्खाने सांगितले? महिला आरक्षणाचे जनक आम्हीच आहोत. भाजप जर स्वतःला महिलांचे कैवारी मानते, तर आरएसएस एखाद्या महिलेला सरसंघचालक करणार का? असा रोखठोक सवाल चव्हाण यांनी विचारला आहे. तसेच राज्यातील प्रत्येक भरतीचा पेपर फुटत असून, या घोटाळ्यांमागे भाजपाचे वरिष्ठ नेते जबाबदार आहेत. दोन-दोन कोटी रुपयांना पेपर विकले जात असून, कोणावरही कारवाई केली जात नाही. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींना कडक शिक्षा करावी, असेही त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik News : राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप आक्रमक; काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने
४० टक्के कमिशन घेतले जात असल्याचा केला आरोप
चव्हाण पुढे म्हणाले की, “नाशिकमध्ये येताना राहुल गांधी यांना खड्डेमय रस्त्यातून (Potholes Road) प्रवास करावा लागला. कुंभमेळ्याचा डीपीआर (DPR) न बनवताच ठराविक कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत. कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गाच्या कामांत ४०-४० टक्के कमिशन घेतले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.




