नवी दिल्ली | New Delhi
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) ९ पैकी ६ लोकसभेच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी मंजुरी दिल्याचे बोलले जाते. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती कुठेही समोर आलेली नाही. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आज (गुरुवारी) दिल्लीत संसदीय दलाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी पक्षाकडून खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आला होता. मात्र, या संसदीय दलाच्या बैठकीला सहा फुटीर खासदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे ठाकरे गटात फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Rajabhau Waje : “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम, पक्ष आणि नेतृत्वांशी फारकत…”; ठाकरे सेनेचे खासदार वाजेंची प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी बंडखोरीचे पाऊल उचलल्याच्या चर्चांनंतर ‘डॅमेज कंट्रोल’साठी ठाकरे गटाकडून पक्षातील फूट रोखण्यासाठी आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्या करिता पक्ष नेतृत्वाने तातडीने ‘व्हिप’ (पक्षादेश) जारी केला होता. मुख्य प्रतोद अनिल देसाई (Anil Desai) यांनी आपल्या सर्व खासदारांना व्हीप बजावून तातडीची बैठक बोलावली आहे. परंतु, या बैठकीला फक्त चार खासदार उपस्थित असून, यात राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि लोकसभेचे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांविरोधात काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले
बैठकीत कोणती चर्चा झाली?
खासदारांनी बोलावलेल्या बैठकीत गैरहजर राहणार्या खासदारांबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. तसेच व्हीप बजावून देखील अनुपस्थित राहणार्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आणखी पुढे काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा : Rajabhau Waje : “…अन् खासदार वाजेंच्या डोळ्यात आलं पाणी”; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
बैठकीला गैरहजर असणारे खासदार
संजय जाधव (परभणी) संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम) नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) ओमराजे निंबाळकर (धाराशिव) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)




